
संजय राऊतांचे भाजपच्या मुंबई अध्यक्षांवर टीकास्त्र
कधी रस्त्यातील बसवर झाड कोसळून तर कधी मॅनहोलमध्ये पडून मुंबईतील निष्पाप नागरिकांचा जीव जाण्याचे प्रकार सुरूच असून याच मुद्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम यांच्यावर कडाडून टीका केली. एकीकडे लोकांचे जीव जातायत, 11 वर्षांचा निष्पापम मुलगा मरतो, दुसरीकडे वृद्ध व्यक्ती मॅनहोलमध्ये पडून वाहून जाते आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम निर्लज्जपणे, दात वेंगाडून हसतोय. निर्लज्जपणाचा कळस आहे हा असं म्हणत राऊतांनी साटम यांना चाटम म्हणत त्यांना झोडपलं. ही क्रूरता आणि विकृती आहे, भारतीय जनता पक्षाचा अंतरात्मा किती क्रूर आणि विकृत आहे असं म्हणतानाच राऊतांनी, साटम यांना पदावरून हटवण्याची मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात थोडी जरी संवेदना शिल्लक असेल, तर अशा माणसाला ताबडतोब पदावरून हाकलून दिलं पाहिजे, असं राऊत म्हणाले.
मुंबईतील मृत्यूंवरून राऊतांचा संताप
मुंबईत दोन मृत्यू झाले. त्यातला एक 11 वर्षांचा शाळकरी मुलगा आहे,तर दुसरा हा सीनिअर सिटीझन आहे. दोन मृत्यू झाले, अनेक जण जखमी झालेत आणि मुंबई भाजपचा अध्यक्ष चाटम.. तो निर्लज्जपणे हसून काल झाड पडलं, काल झाडात एक माणूस मेला, आज मॅनहोलमध्ये मेला.. असं निर्लज्जपणे , दात वेंगाडून हसतोय. ही किती क्रूरता आणि विकृती आहे, अशा शब्दांत राऊतांनी संताप व्यक्त केला.
या भारतीय जनता पक्षाचा अंतरात्मा किती क्रूर आणि विकृत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यात थोडी जरी संवेदना शिल्लक असेल, तर अशा माणसाला ताबडतोब पदावरून हाकलून दिलं पाहिजे. एकतर तुम्ही नालेसफाई केलेली नाही, झाडांच्या संदर्भात ज्या तक्रारी होत्या, ती झाडं तुम्ही नीट कापली नाहीत, म्हणून त्या लहान, 11 वर्षांच्या मुलाचा प्राण गेला. त्याच्या आई-वडिलांचा आक्रोश सुरू असताना तुम्ही निर्लज्जासारखे हसताय, लाज वाटली पाहिजे. जगातील सगळ्यात मोठा निर्लज्ज पक्ष आहे हा भारतीय जनता पक्ष, मुंबईचा जो त्यांचा अध्यक्ष आहे चाटम, त्याने हे काल दाखवून दिलं.असं राऊतांनी सुनावलं.
4 टक्के कुणाचं कमिशन ?
काहीही झालं की शिवसेनेमुळे झालं म्हणायचं. पण अरे वर्षावर तुम्ही आहात ना, त्याच्या आधी तीन वर्ष तुमचं प्रशासन आहे ना, ठेकेदारांचं राज्य चालवलं आहे तुम्ही तिथे. 104 टक्के नालेसफाई झाली म्हणे, 100 टक्के नव्हे 104 टक्के.. हे वरचे 4 टक्के कुणाचं कमिशन आहे ? असा सवाल राऊतांनी विचारला.
100 टक्के नालेसफाई होते हे बोलू शकतो, 104 टक्के , 4 टक्के कमिशन आहे, बोनस.. कुठे झाली नालेसफाई ? मुंबई तुंबली आहे. आर्थिक राजधानी आहे ना या देशाची, तुम्ही अडाणीच्या मदतीने मुंबईचं काही वेगळं करायला निघाले आहात ना, मग मुंबईची ही अवस्था ? माणसं वाहून जातायत, गाड्या तरंगत आहे, अमिताभ बच्चनच्या घरात पाणी गेलंय, काय चाललंय काय ? आणि निर्लज्जपणे हसताय माणसं मेल्यावर ? वेदना, संवदेना, दु:ख, संयम नाही.. असं राूत म्हणाले.
याच लोकांनी राम मंदिर लुटलं. अशा विकृतीचे, साटम सारखे लोक, तेच अयोध्येत आहेत. यांच्यामुळेच राम मंदिर लुटलं गेलंय, इथे मुंबईची तिजोरी लुटली, तिथे राम मंदिर लुटल , निर्लज्ज पक्ष आहे हा, अशा शब्दांत राऊतांनी घणाघात करत भाजपवर टीकास्त्र सोडलं.