
मुंबईसह एमएमआर परिसरातील नागरिकांना महागाईचा आणखी एक मोठा झटका बसला आहे. वाढते तापमान आणि भाजीपाल्याचा घटलेला पुरवठा यामुळे बाजारात भाजीपाल्यांच्या दरात सरासरी 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक 20 ते 30 टक्क्यांनी घटल्याने दरवाढ अधिक तीव्र झाली आहे.
सध्या फ्रेंच बीन्सचा दर तब्बल 200 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचला आहे. आठवडाभरापूर्वी हा दर 130 ते 170 रुपयांच्या दरम्यान होता. हिरवी मिरची 100 रुपयांवरून थेट 150 रुपये प्रतिकिलो झाली आहे. तर टोमॅटोचे दर 25 रुपयांवरून वाढून 50 ते 60 रुपये प्रतिकिलोवर गेले आहेत. याशिवाय लिंबू, कोथिंबीर, पापडी आणि फ्लॉवरच्या दरातही मोठी वाढ झाली असून, काही भाज्यांचे दर 100 ते 120 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत. दरम्यान, पुणे, सातारा, सोलापूर आणि नाशिकसारख्या प्रमुख पुरवठादार भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट असल्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. उत्पादन घटल्याने बाजारात भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण झाला असून, त्याचा थेट परिणाम दरांवर होत असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर मोठा ताण येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, आगामी काळात महागाई आणखी वाढण्याची भीतीही वर्तवली जात आहे.