
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) सध्या सर्व काही अलबेल नसल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. नुकतेच पक्षाचे सरचिटणीस आनंद परांजपे यांनी राजीनामा देत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे या चर्चांना बळ मिळाले. त्यातच राष्ट्रीय कार्यकारिणीवरून प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे नाराज असल्याच्या चर्चा आणि पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट, यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी “राष्ट्रवादीचे २४ आमदार भाजपमध्ये जातील” असा खळबळजनक दावा केला होता. आता याच मुद्द्यावरून काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी रोहित पवारांच्या दाव्याला दुजोरा देत आणखी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.
“राष्ट्रवादी नक्की चालवतंय कोण?”
पत्रकारांशी बोलताना अतुल लोंढे यांनी राष्ट्रवादीच्या सद्यस्थितीवर थेट बोट ठेवले. ते म्हणाले, “सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमकं कोण चालवत आहे? शरद पवार, भाजप, सुनील तटकरे की प्रफुल पटेल? हा खरा प्रश्न आहे. राष्ट्रवादीमध्ये सध्या तीव्र अंतर्गत कलह माजला असून हा पक्ष लवकरच फुटणार आहे.”
पुढे बोलताना त्यांनी रोहित पवारांच्या विधानाचे समर्थन केले आणि सांगितले की, रोहित पवारांकडे तब्बल 40 लोकांची नावे आहेत जे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ‘देशात विरोधी पक्षच राहणार नाही’ असे म्हटले होते, त्याचाच हा भाग आहे. सत्तेत गेल्यावर हे लोक फुटणार अशा बातम्या सातत्याने येत आहेत, असेही लोंढे म्हणाले.
“उद्धव ठाकरेंपेक्षा मोदींची संसदेतील उपस्थिती कमी”
शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेतील कमी उपस्थितीबाबत विचारलेल्या प्रश्नावर लोंढे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंची उपस्थिती कमी होती हे जरी खरे असले, तरी पंतप्रधान मोदींची संसदेतील उपस्थिती त्याहूनही कमी आहे, असा दावा त्यांनी केला. “पंतप्रधान फक्त टिंगलटवाळी करण्यासाठी संसदेत येतात,” अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.