
सनरायझर्स हैदराबादने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील निर्णायक सामन्यात सोमवारी 18 मे रोजी चेन्नई सुपर किंग्सला पराभूत केलं. हैदराबादचा हा आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील आठवा आणि चेन्नई विरुद्धचा दुसरा विजय ठरला. सनरायरझर्स हैदराबादने यासह प्लेऑफमध्ये धडक दिली. हैदराबादच्या विजयामुळे गुजरात टायटन्सलाही फायदा झाला. गुजरातनेही प्लेऑफचं तिकीट मिळवलं. यासह प्लेऑफसाठी 3 संघ निश्चित झाले. आरसीबीनंतर, हैदराबाद आणि गुजरात असे 3 संघ प्लेऑफसाठी निश्चित झाले आहेत. त्यामुळे आता प्लेऑफच्या एका जागेसाठी जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. या एका जागेसाठी 3 संघांमध्ये चुरस असणार आहे. मात्र 2 संघांमध्ये प्रमुख लढत असणार आहे. या निमित्ताने एका जागेसाठी कोणते संघ शर्यतीत आहेत? हे जाणून घेऊयात.
गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 17 मे रोजी पंजाब किंग्सला पराभूत केलं. आरसीबीने यासह प्लेऑफमध्ये धडक दिली. यासह आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच 61 सामन्यानंतर प्लेऑफसाठी पहिला संघ निश्चित झाला. त्यानंतर सोमवारी 18 मे चेन्नईसाठी हैदराबाद विरुद्धचा सामना निर्णायक असा होता.
चेन्नईचा पराभव, प्लेऑफची संधी हुकणार?
चेन्नईला हा सामना जिंकून स्वत:च्या जोरावर प्लेऑफमध्ये पोहचण्याची शक्यता कायम राखण्याची संधी होती. मात्र आता चेन्नईचं आव्हान हे इतर संघांवर अवलंबून असणार आहे. तसेच चेन्नईने सामना जिंकला असता तर आरसीबी प्लेऑफच्या टॉप 2 मध्ये कायम असते. मात्र हैदराबादच्या विजयामुळे तसं होऊ शकलं नाही. आता पराभवामुळे चेन्नईची यंदा प्लेऑफवारी हुकणार असं चित्र आहे. मात्र चेन्नईचं आव्हान कायम आहे.
चेन्नई विरुद्ध हैदराबाद सामन्यानंतरही एका जागेसाठी आता 5 संघात चुरस आहे. चेन्नई, राजस्थान, दिल्ली, केकेआर आणि पंजाब या संघांना संधी आहे. मात्र त्यातही राजस्थान आणि पंजाबला प्लेऑफची सर्वाधिक संधी आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
चेन्नईचा साखळी फेरीतील 14 वा आणि शेवटचा सामना हा 21 मे रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध होणार आहे. चेन्नईने हा सामना जिंकला तरी त्यांचे 14 गुण होतील. तर गुजरातचा साखळी फेरीतील आपला शेवटचा सामना जिंकून टॉप 2 मध्ये राहण्याचा प्रयत्न असणार आहे. चेन्नईची हैदराबाद विरूद्धच्या पराभवामुळे प्लेऑफची शक्यता ही 6.8 इतकी आहे. त्यामुळे चेन्नईला इतर संघांच्या तुलनेत प्लेऑफची संधी नाहीच, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
राजस्थान आणि पंजाबला किती संधी?
पंजाबचा साखळी फेरीतील 1 आणि राजस्थानचे 2 सामने बाकी आहेत. पंजाबसमोर शेवटच्या सामन्यात 23 मे रोजी लखनौचं आव्हान असणार आहे. पंजाबने हा सामना जिंकला तर त्यांचे 15 गुण होतील. मात्र स्वत:च्या जोरावर प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी 15 गुण पुरेसे नाहीत. त्यामुळे पंजाबचं भवितव्य हे इतर सामन्यांच्या निकालावरही अवलंबून आहे.
तसेच राजस्थानसमोर शेवटच्या 2 सामन्यांत लखनौ आणि मुंबईचं आव्हान असणार आहे. राजस्थानने हे दोन्ही सामने जिंकले तरच एकूण 16 गुण होतील. मात्र राजस्थानच्या हातात त्यांचं प्लेऑफच गणित आहे. राजस्थानची प्लेऑफमध्ये पोहचण्याची शक्यता ही 34.9 टक्के इतकी आहे. तर पंजाबला प्लेऑफची संधी ही 33.6 टक्के इतकी आहे. त्यामुळे या एका जागेसाठी इतर संघांच्या तुलनेत पंजाब आण राजस्थानमध्येच चुरस पाहायला मिळणार आहे.