
मुसळधार पावसाला आता सुरुवात झाली आहे. अशात अनेक समस्या निर्माण होतात. त्वचा रफ होते, तर केस देखील गळू लागतात. एवढंच नाही तर, केसांत कोंडा देखील वाढतो. पावसाळा सुरु झाल्याने केसांची चिंता सुरू होते. तेलकट टाळू, केस गळणे आणि कोंडा देखील वाढतो. जर तुम्हालाही पावसाळ्यात केसांच्या या सर्व समस्यांचा सामना करावा लागत असेल, तर प्रसिद्ध केस सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब यांच्या काही सोप्या टिप्स तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. जावेदच्या मते, पावसाळ्यात केसांना थोडी अधिक आणि योग्य काळजी घेणं आवश्यक असतं. काही सोप्या नियमांचं पालन करून, पावसाळ्यातील दमट हवामान, धूळ आणि प्रदूषणापासून केसांचं संरक्षण करून त्यांना निरोगी आणि चमकदार ठेवणं शक्य आहे.
नियमित केस धुणे आणि योग्य दिनचर्या: पावसाळ्यात घाम आणि हवेतील आर्द्रतेमुळे टाळू खूप लवकर तेलकट होते. त्यामुळे, या काळात दररोज केस धुणं खूप महत्त्वाचं आहे. शॅम्पू लावण्यात अजिबात आळस करू नका. मात्र, या ऋतूत कंडिशनर वापरण्याऐवजी ‘प्री-कंडिशनिंग’वर भर द्या. पण शॅम्पू लावण्यापूर्वी केसांना तेल नक्की लावा. यामुळे तुमचे केस मऊ आणि निरोगी राहण्यास मदत होईल. आठवड्यातून किमान एकदा क्लेरिफायिंग शॅम्पू वापरा . तुमचे केस कोरड्या प्रकारचे असले तरी, तो टाळूच्या खोलवरची घाण स्वच्छ करण्यास मदत करतो.
केसांची स्टाईल करणे टाळा: पावसाळ्यात केसांवर विविध रसायने असलेली स्टाईलिंग उत्पादने वापरणं टाळा. ही उत्पादने टाळूवर जमा होतात आणि केसांच्या मुळांना गंभीर नुकसान पोहोचवतात. तुमचे केस नेहमी बांधून ठेवू नका. अधूनमधून ते मोकळे सोडा, जेणेकरून हवा खेळती राहील आणि टाळूवर घाम साचण्याचे प्रमाण कमी होईल.
शॅम्पू लावल्यानंतर केस नैसर्गिकरित्या सुकू देऊ नका. केस धुतल्यानंतर लगेचच हेअर ड्रायरने (कमी उष्णतेवर किंवा सौम्य उष्णतेवर) ते पटकन सुकवा. यामुळे कोंड्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणती गंभीर समस्या असेल तर, डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या…