
सध्या सर्वत्र नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेली ‘देसी ब्लिंग’ ही सीरिज चांगलीच चर्चेत आहे. या सीरिजमध्ये दुबईमधली अब्जाधीश असलेल्या व्यावसायिकांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. तसेच छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कपल करण कुंद्रा आणि तेजश्री प्रकाशदेखील दिसत आहेत. ते दोघेही दुबईमध्ये बिझनेस करण्यासाठी गेले आहेत. तसेच ते तेथील लोकांच्या राहणीमानाशी जुळवून घेताना दिसत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर या शोमध्ये दाखवण्यात आलेल्या एका कपलवर जोरदार टीका होताना दिसत आहे.
‘देसी ब्लिंग’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. या शोमध्ये सतीश सनपाल आणि बिंदा सनपाल यांची चर्चा होत आहे. यात बिंदाने तिच्या पतीबद्दल म्हटले आहे की, तो इतर मुलींसोबत पार्टी करतो. या वक्तव्यामुळे तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे. तर अनेक जण अफेअरला प्रोत्साहन देत असल्यावरून तिच्यावर टीका करताना दिसत आहेत. इतकेच नाही तर शोमध्ये बिंदाने हे देखील सांगितले की, ती सकाळी उठून तिचा पती सतीशचे पाय दाबते. याचदरम्यान चित्रपट निर्मात्या लक्ष्मी अय्यर यांनी तिच्यावर कडक शब्दांत टीका केली आहे.
लक्ष्मी अय्यर यांनी केली बिंदावर टीका
चित्रपट निर्मात्या लक्ष्मी आर. अय्यर यांनी सोशल मीडियावर लिहिले, “मी एका रिॲलिटी शोची क्लिप पाहिली, ज्यामध्ये एका पत्नीने सांगितले की तिला तिच्या पतीने फसवले तरी काही अडचण नाही, अट फक्त एवढीच की तीच स्त्री पुन्हा पुन्हा यायला नको. हा मूर्खपणा सामान्य (नॉर्मल) बनवणे थांबवा. ‘मॉडर्न’ किंवा ‘कूल’ असण्याच्या नावाखाली अशी घाणेरडी उदाहरणे समोर आणणे थांबवा. एकनिष्ठ असणे आजही आकर्षक आहे. प्रामाणिक असणे आजही आकर्षक आहे. हे सगळं संपलंय, यावर सोशल मीडियाला विश्वास ठेवायला लावू नका.” लक्ष्मी अय्यर यांच्या या विचाराला टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने पाठिंबा दिला आहे. ती म्हणाली, “होय… साहजिकच आहे, जर तो माणूस त्याच स्त्रीला पुन्हा पुन्हा भेटला, तर तो नक्कीच तिच्या प्रेमात पडेल.”
नेटफ्लिक्सच्या ‘देसी ब्लिंग’ शोमध्ये सतीशने म्हटले आहे की, “पैसा देव तर नाही, पण देवापेक्षा कमीही नाही.” तसेच स्टायलिश राहण्यावर तो म्हणाला, “छान वाटतं ना जेव्हा मुली आपल्याकडे पाहतात.” यानंतर बिंदाने पतीच्या पार्टी करण्याच्या वक्तव्याला पाठिंबा देत खुलासा केला की, सतीशला इतर महिलांसोबत पार्टी करायला आवडते. ती म्हणाली, “सतीशला मुलींसोबत वेळ घालवायला खूप आवडते. मला आधी त्याचा हेवा वाटायचा (मी जळायचे), पण माझा त्याच्यावर विश्वास होता.”
सतीश बिंदाला देतो ३ किलो सोनं
पुढे बिंदा म्हणाली, “जोपर्यंत तो प्रत्येक वेळी वेगवेगळ्या महिलांसोबत पार्टी करतो, तोपर्यंत मला कोणतीही अडचण नाही. अडचण तेव्हा येते जेव्हा तो एकाच स्त्रीसोबत वारंवार वेळ घालवतो, कारण हे त्यांच्यात काही भावनिक कनेक्शन (इमोशनल कनेक्शन) असल्याचे संकेत असू शकते. जर तो रात्रभर इतर महिलांसोबत पार्टी करत राहिला, तरीही मला काही फरक पडत नाही.”
बिंदाने असेही सांगितले की तिच्याकडे तब्बल ४० किलो सोने आहे आणि सतीश दरवर्षी धनत्रयोदशीला तिला ३ किलो सोने भेट म्हणून देतो. बिंदाने पुढे सांगितले की, “मी रोज सकाळी त्याच्या पायांची मालिश करते. तो एखाद्या राजपुत्रासारखा जागा होतो. एक हिंदू असल्याकारणाने, त्यांचा असा विश्वास आहे की जर पत्नीने रोज सकाळी पतीच्या पायांना स्पर्श केला, तर घरात भरपूर लक्ष्मी येते.”