
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावत आहे, अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. आज जोरदार वादळी वाऱ्याचा छत्रपती संभाजीनगर विमानतळाला फटका बसला आहे. वादळी वाऱ्यामुळे विमानतळावरचे छप्पर कोसळले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे, मात्र या घटनेमुळे विमानतळाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संभाजीनगरसह इतरही जिल्ह्यांना आज पावसाने झोडपून काढले, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
नांदेड : हरिनाम सप्ताहानिमित्त उभारलेला मंडप उडाला
नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील विळेगांव थडी येथे अधिक मासानिमित्त अखंड शिवनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी भव्यदिव्य असा मंडप उभारला होता. पण सायंकाळच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्याने मंडप मोडून खाली पडला तर मान्सूनपूर्व पावसाने भाविकांसाठी बनविण्यात येत असलेल्या महाप्रसादाच्या स्वयंपाकाचे मोठे नुकसान झाले आहे.
नाशिकच्या मालेगावमध्ये गारपीट
सलग दुसऱ्या दिवशी मालेगावात वादळी वाऱ्यासह गारपीटीसह पाऊस पडला, या पावसामुळे उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह दमदार पावसाची हजेरी लावल्याने शहरी भागात गारवा निर्माण झाला, मात्र ग्रामीण भागात शेतकरी वर्गाचे हाल झाले. शेतात काढून ठेवलेला कांदा भिजल्यामुळए अनेकांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
धाराशिवमध्ये मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी
धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील मुरूम आणि दाळींब परिसरात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होत वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. काही वेळातच पावसाचा जोर वाढल्याने नागरिकांची एकच धावपळ उडाली. या पावसामुळे उन्हाच्या तीव्रतेने त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून परिसरात गारवा निर्माण झाला आहे. दरम्यान, शेतकरी वर्गासाठी हा पाऊस समाधानकारक मानला जात असला, तरी जोरदार वाऱ्यामुळे काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अमरावती शहरात पावसाच्या सरी
आज अमरावरी शहरात पावसाच्या सरी कोसळल्या. दहा मिनिटाच्या पावसाने वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला आहे, त्यामुळे अमरावतीकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र या पावसामुळे वाहनचालकांची चांगलीच दैना उडाली. अनेकांना पावसात वाहन चालवताना कसरत करावी लागली.