
एका टिप्पणीमधून कॉकरोच जनता पार्टी जन्माला आली. आता या कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दीपके यांच्याबद्दल आज उद्धव ठाकरे यांनी महत्वाची घोषणा केली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणात अभिजीत दीपके मागच्या काही दिवसांपासून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. त्यासाठी ते देशाच्या वेगवेगळ्या शहरात आंदोलनं करत आहेत. आता उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. “मी एका विषयासाठी आलो आहे. लोक बोलत नाहीत. जंतरमंतरवर दीपकेने जो विषय उचलला तो अनेक युवकांच्या भवितव्याचा विषय आहे. नीटचे परीक्षा पेपर फुटले. विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. कोणी लक्ष दिले. सरकारला वेळ नाही. खासदार फोडाफोडीकडे त्यांचं लक्ष आहे” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
“विद्यार्थ्यांचं नशीब फुटलं आहे. सोनम वांगचूक आणि दीपकेंच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहे” अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. “वांगचुक भेटून गेले. त्यांच्या बुद्धिमतेचा वापर केला पाहिजे. 16 दिवसापासून ते आमरण उपोषण करत आहेत. चार दिवसापूर्वी अरविंद सावंत त्यांना भेटायला गेले होते. मी त्यांच्याशी फोनवरून बोललो. आंदोलन करू नका. तुमची गरज आहे, असं म्हटलं. पण सरकारला त्यांची गरज नाही. एक एक व्यक्ती गेला तर सरकारला ते पाहिजेच आहे. असं नाईलाजाने म्हणावं लागतंय” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
हे हिणकस आणि नीच प्रवृत्तीचं आहे
“सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावत चालली आहे. एक क्षण आला आहे, सर्व जणांनी सर्व विषय घेण्याची आवश्यकता नाही. पण एखाद्या विषयावर देशातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यावे असं म्हणतोय. पक्षाचे झेंडे घेऊन जावं असं म्हणत नाही. दीपके देशातील युवकांचा आवाज उठवत आहे. हे शिकलेले युवक आहेत” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“20 तारखेला त्यांनी मोर्चा आयोजित केला आहे. दीपकने दावा केला आहे. काही गुंड तिकडे सोडून आंदोलन चिरडलं जाणार आहे, असा दीपकेंचा दावा आहे. हे हिणकस आणि नीच प्रवृत्तीचं आहे. वांगचुक आणि दीपके कुणासाठी लढत आहे. आपल्यासाठीच लढत आहे. देशातील युवकांनी याकडे लक्ष द्यावा. हा राजकारणाचा विषय नाही. देशाचा विषय आहे. प्रत्येक राजकीय पक्षांनी त्यांच्या समर्थनार्थ काही तरी आपल्या राज्यात केलं पाहिजे. देश जागा झाल्याशिवाय बेफिकिर सरकार काही करणार नाही” असं उद्धव ठाकरे म्हणाले.