
बिहारची राजधानी असलेल्या पाटणाजवळील गंगा नदीत गुरुवारी पहाटे भीषण बोट दुर्घटना घडली असून या अपघातात आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 6 ते 7 जण अद्याप बेपत्ता असल्याने शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे. उमानाथ घाटाजवळ भाजीपाला घेऊन परतणारी बोट जोरदार वाऱ्यामुळे नदीच्या मध्यभागी उलटल्याने हा भीषण अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बरह पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मासूमगंज बिंद टोली येथील नागरिक रोजप्रमाणे गंगा नदीपलीकडील समस्तीपूर जिल्ह्यातील सुलतानपूर दियारा येथे शेतीच्या कामासाठी गेले होते. काम आटोपून हे नागरिक पहाटे भाजीपाल्याने भरलेल्या लहान बोटीतून उमानाथ घाटाकडे परतत होते. मात्र सकाळी साडेपाचच्या सुमारास नदीत अचानक जोरदार वारे सुरू झाले. त्यामुळे बोट नियंत्रणाबाहेर जाऊन एका बाजूला कलंडली आणि काही क्षणांतच खोल पाण्यात उलटली.
बोटीत सुमारे 15 ते 16 जण प्रवास करत होते. अपघातानंतर नदीत एकच आक्रोश पसरला. स्थानिक मच्छीमार आणि ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य सुरू करत अनेकांना बाहेर काढलं. आतापर्यंत 7 जणांना सुखरूप वाचवण्यात यश आलं असून 3 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांमध्ये लीला देवी (40), नीलम कुमारी (30) आणि काशी कुमार (15) यांचा समावेश आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून SDRF च्या पथकाकडून गंगा नदीत मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली जात आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार 5 जण बेपत्ता आहेत, तर कुटुंबीयांनी 7 जणांचा शोध लागत नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.