
केंद्र सरकारने चांदीच्या आयातीसंदर्भात मोठा निर्णय घेत 99.9 टक्के शुद्ध चांदीच्या आयातीवर निर्बंध लागू केले आहेत. तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आलेल्या या निर्णयानुसार, आता चांदी आयात करण्यासाठी केंद्र सरकारची विशेष परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. या निर्णयामुळे चांदीची आयात ‘मुक्त श्रेणी’तून थेट ‘प्रतिबंधित श्रेणी’मध्ये गेली आहे. काही दिवसांपूर्वीच सरकारने सोनं आणि चांदीवरील आयात शुल्क 6 टक्क्यांवरून वाढवत 15 टक्के केले होते. त्यानंतर आता चांदीच्या आयातीवर आणखी कठोर नियम लागू करण्यात आल्याने सराफ बाजारात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, या निर्णयाचा मोठा परिणाम देशातील सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावच्या सराफ बाजारावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक व्यापाऱ्यांच्या मते, भारतीय रुपयाला मजबूत करण्यासाठी सरकार आयात कमी करण्याचा प्रयत्न करत असून, चांदीवर आणखी निर्बंध आणण्यात आले आहेत.
व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, आता प्रत्येक आयातीसाठी विशेष परवानगी आवश्यक असल्याने चांदीचा पुरवठा कमी होऊ शकतो. भविष्यात चांदीचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असून, त्याचा थेट परिणाम बाजारभावांवर होणार आहे. त्यामुळे येत्या काळात चांदीचे दर आणखी वाढण्याची शक्यता सराफ व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे.