
राज्यात चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. विविध राजकीय ऑफर्स मिळूनही राजाभाऊ वाजे यांनी त्या नाकारत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास कायम ठेवला असल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.
राजाभाऊ वाजे यांच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, गेल्या तीन ते चार महिन्यांपासून ‘ऑपरेशन टायगर’ राबवले जात असल्याची चर्चा सुरू होती. तसेच 13 एप्रिल रोजी काही व्यक्तींची एक समिती भेटीसाठी आली होती, असा दावाही त्यांनी केला.
यावेळी राजाभाऊ वाजे यांना मोठ्या आर्थिक आणि विकासकामांच्या ऑफर्स देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. “50 कोटी रुपयांसह जवळपास 100 कोटी रुपयांच्या विकासकामांचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र या ऑफर्स स्वीकारण्यास राजाभाऊ वाजे यांनी स्पष्ट नकार दिला,” असा दावा त्यांच्या वडिलांनी केला.
तसेच, ‘ऑपरेशन टायगर’मध्ये सहभागी होण्यासाठी दबाव आणि प्रलोभने देण्यात आली होती, मात्र राजाभाऊ वाजे यांनी कोणतीही ऑफर न स्वीकारता ठाकरे गटासोबतच राहण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राज्यात ठाकरे गटातील खासदारांच्या संभाव्य भूमिकेबाबत विविध चर्चा सुरू असताना राजाभाऊ वाजे यांच्या या भूमिकेमुळे राजकीय चर्चांना नवे वळण मिळाले आहे. मात्र या दाव्यांबाबत संबंधितांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.