
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय भवितव्याबाबत मोठे विधान करत, “एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाहीत,” असा ठाम दावा केला आहे. बच्चू कडू यांनी “देशात देवेंद्र फडणवीस आणि राज्यात एकनाथ शिंदे” अशी भूमिका मांडल्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली.
संजय राऊत म्हणाले, “कोण काय बोलतंय याच्याशी मला काही देणंघेणं नाही. मी काल जे बोललो, त्या मतावर आजही ठाम आहे. एकनाथ शिंदे पुन्हा या राज्याचे मुख्यमंत्री होणार नाहीत.”
पुढे बोलताना त्यांनी शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतही टीका केली. “शिवसेना फोडण्यासाठीच त्यांचा वापर करण्यात आला. शिवसेना फोडल्याचे बक्षीस म्हणून त्यांना मुख्यमंत्री करण्यात आले. आता त्यांनी त्यांच्या कामाचा अहवाल दिला आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,” असा दावा संजय राऊत यांनी केला.
दरम्यान, बच्चू कडू यांनी भाजपने एकनाथ शिंदे यांच्या योगदानाचा विचार करून त्यांच्याबाबत परोपकारी भूमिका घ्यावी, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर संजय राऊत यांच्या या प्रतिक्रियेमुळे राज्यातील सत्तासमीकरणांवर आणि मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांवर पुन्हा राजकीय वातावरण तापले आहे. आता या विधानावर शिंदे गट आणि भाजपकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.