Headlines

Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!

Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!
Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!


शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील काही खासदारांच्या संभाव्य फुटीच्या चर्चांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना शिंदे गटाचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे गटातील 9 पैकी 6 खासदार पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याच्या चर्चांदरम्यान सामंत यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

माध्यमांशी बोलताना उदय सामंत म्हणाले की, “दिल्लीत झालेल्या ठाकरे गटाच्या खासदारांच्या बैठकीला केवळ तीन खासदार उपस्थित होते. उर्वरित सहा खासदार कुठे गेले, हे मलाही माहिती नाही.” त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे.

ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांमुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याच्या प्रश्नावर सामंत यांनी प्रतिक्रिया देताना, “निर्णय होऊ द्या, त्यानंतर त्यावर बोलणे योग्य राहील,” असे सांगितले.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्रीपद आणि नेतृत्वाच्या मुद्द्यावरही भाष्य केले. “शिवसैनिक म्हणून एकनाथ शिंदे हे उच्च पदावर जावेत, अशी आमची इच्छा आहे. प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्यांना आपला नेता उच्च पदावर जावा असे वाटते. मात्र विरोधी पक्षनेते अंबादास दानवेही जर एकनाथ शिंदे उच्च पदावर जावेत असे म्हणत असतील, तर त्यांच्या मनात नेमके काय आहे हे मला समजत नाही,” असे सामंत म्हणाले.

संजय राऊत यांच्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. “एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व सर्वमान्य होत आहे. महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनाही त्याची जाणीव होत आहे. त्यामुळे काही लोकांना पोटशूळ उठतो,” असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, ठाकरे गटातील खासदारांच्या संभाव्य प्रवेशाबाबत आणि त्यांना मंत्रिपद मिळणार का, याबाबत विचारले असता सामंत यांनी कोणतीही ठोस प्रतिक्रिया देणे टाळले. “याबाबत मला कोणतीही माहिती नाही,” असे त्यांनी सांगितले.

अरविंद सावंत यांनी उद्धव ठाकरे भेटीसाठी वेळ देत नसल्याची नाराजी व्यक्त केल्याच्या प्रश्नावर सामंत म्हणाले, “चिडून काहीही साध्य होत नाही. एखादी व्यक्ती अशी भावना व्यक्त करत असेल, तर त्याचा विचार केला पाहिजे. आम्ही उठाव केला तेव्हाही आमची भूमिका अशीच होती. चिडण्यापेक्षा आत्ममंथन करणे गरजेचे आहे.”

दरम्यान, ठाकरे गटातील खासदारांच्या संभाव्य भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चांमुळे राज्याच्या राजकारणात उत्सुकता वाढली असून, पुढील काही दिवसांत या घडामोडींना कोणते वळण मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *