
राज्यातील अनेक भागात पावसाला सुरूवात झाली आहे. आता हवामान विभागाने उत्तर भारतासह देशातील अनेक राज्यांमध्ये पुढील सात दिवस वादळी वारे आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या काळात ताशी 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, बिहारसह अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रीय झाल्याने हवामानत हा बदल होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटलं आहे.
उत्तर भारतात वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा
उत्तर भारतातील जम्मू-काश्मीर, लडाख आणि उत्तराखंडमध्ये 13 ते 19 जूनदरम्यान पावसाचा अंदाज आहे. हिमाचल प्रदेशमध्ये 14 जूनपासून 19 जूनपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पूर्व राजस्थान, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये 13 ते 19 जूनदरम्यान, तर पूर्व उत्तर प्रदेशमध्ये 13, 18 आणि 19 जून रोजी पावसाची शक्यता आहे. पश्चिम राजस्थानमध्ये 13 ते 17 जून आणि 19 जून रोजी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
त्याचबरोबर हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब, राजस्थान, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये 13 ते 14 जूनदरम्यान, तर उत्तराखंडमध्ये 13 ते 15 जूनदरम्यान ताशी 60 किलोमीटर वेगाने वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम राजस्थानमध्ये 13 जून रोजी धुळीच्या वादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मध्य भारतात पावसासह वादळी वाऱ्यांचा इशारा
छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश आणि विदर्भात 13 ते 19 जूनदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. पूर्व आणि पश्चिम मध्य प्रदेशमध्ये 14 ते 16 जूनदरम्यान, तर छत्तीसगड आणि विदर्भात 13 ते 17 जूनदरम्यान जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागांमध्ये मेघगर्जनेसह वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्येही पावसाचा इशारा
पूर्व भारतातील अंदमान-निकोबार बेटे, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये 13 ते 19 जूनदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज आहे. गंगेच्या खोऱ्यातील पश्चिम बंगालमध्ये 17 ते 19 जून, तर ओडिशामध्ये 19 जून रोजी जोरदार पावसाची शक्यता आहे. बिहार आणि झारखंडमध्ये 13 ते 19 जून, तर ओडिशामध्ये 14 ते 19 जूनदरम्यान पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. अंदमान-निकोबार बेटे, झारखंड, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि बिहारमध्ये काही ठिकाणी जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे.
ईशान्य भारतात सात दिवस मुसळधार पाऊस कोसळणार
भारताच्या ईशान्य भागातील अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये 13 ते 19 जूनदरम्यान मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये 15 ते 16 जून आणि पुन्हा 17 ते 19 जूनदरम्यान अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर आसाम आणि मेघालयमध्ये 14 ते 16 जून, तर नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये 13 ते 15 जूनदरम्यान जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.