
राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी कर्जमाफी योजनेला अखेर मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे पीक कर्ज माफ होणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा थेट फायदा होणार आहे. तसेच 65 लाखांहून अधिक कर्जखात्यांना तब्बल 36 हजार 585 कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार असल्याचे वृत्त आहे. जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करतात, त्यांना प्रोत्साहनपर रक्कमही देण्यात येणार आहे. आचारसंहिता असल्यमामुळे अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र लवकरच यावर शिक्कामोर्तब होईल असं सांगतिलं जात आहे.
गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी विविध ठिकाणी आंदोलने करण्यात आली होती. गारपीटीमुळे झालेल्या नुकसानानंतर बच्चू कडू आणि इतर नेत्यांनीही आंदोलन छेडले होते. त्यानंतर सरकारने 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते.