
आम्हाला किंमत मोजावी लागली..! आरसीबीविरुद्ध पराभव झाल्यानंतर पंतऐवजी निकोलस पूरनने मांडली बाजूImage Credit source: LSG Twitter
आयपीएल 2026 स्पर्धेतील 23व्या सामन्यात आरसीबी आणि लखनौ सुपर जायंट्स हे संघ भिडले. या सामन्यात आरसीबीने लखनौ सुपर जायंट्सला 5 गडी आणि 29 चेंडू राखून पराभूत केलं. या पराभवानंतर लखनौ सुपर जायंट्सची गुणतालिकेत सातव्या स्थानावर घसरण झाली आहे. लखनौ सुपर जायंट्सने आतापर्यंत स्पर्धेत 5 सामने खेळले असून त्यापैकी तीन सामन्यात पराभव आणि 2 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे लखनौ सुपर जायंट्सला उर्वरित 9 सामन्यापैकी किमान पाच सामन्यात चांगली कामगिरी करावी लागणार आहे. अन्यथा प्लेऑफचा प्रवास कठीण होईल. या सामन्यात कर्णधार ऋषभ पंत फेल गेला. फलंदाजीला आला पण दुखापतीमुळे सुरूवातीला रिटायर्ड हर्ट झाला. त्यानंतर परत फलंदाजीला उतरला आणि 1 धाव करून बाद झाला. तर दुसऱ्या डावात निकलस पूरनने जबाबदारी पेलली. या पराभवानंतर प्रभारी कर्णधार निकलस पूरन याने आपलं म्हणणं मांडलं.
प्रभारी कर्णधार निकलस पूरन म्हणाला की, ‘आमच्यासाठी हा हंगाम कठीण गेला आहे. आमची फलंदाजी अपेक्षेपेक्षा सुमार राहिली आहे. 175 धावा आमच्यासाठी स्पर्धात्मक ठरल्या असत्या. पण हे काही गुपित नाही की आम्ही संपूर्ण हंगामात फलंदाजीसाठी झगडत आहोत आणि आज आम्हाला त्याची किंमत मोजावी लागली. हे टी20 क्रिकेट आहे. हा एक कठीण खेळ आहे. यात सातत्य राखणे देखील कठीण असते. पण खेळाडू खूप मेहनत करत आहेत आणि त्याचे श्रेय त्यांनाच जाते. आम्ही सुद्धा लढण्याचा प्रयत्न करू. आणि माझा विश्वास आहे की ही केवळ वेळेची बाब आहे. फक्त संयम ठेवावा लागेल, संधी मिळेल तेव्हा तयार राहावे लागेल आणि त्यासोबत जबाबदारीही घ्यावी लागेल.’
प्रभारी कर्णधार निकलस पूरनने स्वत:च्या फलंदाजीबाबत सांगितलं की, ‘मला खूप छान वाटत आहे आणि मी चेंडू चांगला मारत आहे. दुर्दैवाने, या स्पर्धेत आतापर्यंत गोष्टी माझ्या मनासारख्या घडल्या नाहीत. पण असे यापूर्वीही घडले आहे. मी या परिस्थितीतून आधीच गेलो आहे, मला माहित आहे की कसे लढायचे. आणि माझा विश्वास आहे की मी यातून बाहेर पडेन.’