
आज राजधानी नवी दिल्लीत विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या बैठक पार पडली. या बैठकीला देशभरातील 25 पक्षांचे नेते हजर होते. या बैठकीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले की, आघाडीची बैठक आता दर दोन महिन्यांनी आयोजित केली जाईल. पुढील बैठक हैदराबाद येथे होणार आहे. 8 ऑगस्टला पुन्हा सर्व नेते एकत्र जमणार आहेत. आजच्या बैछरीकत पाच मुद्द्यांवर एकमत झाल्याही माहिती खरगे यांनी दिली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
या 5 मुद्द्यांवर एकमत
विरोधकांच्या बैठकीनंतर आयोजिक पत्रकार परिषदेत बोलताना खरगे यांनी म्हटले की, पाच महत्त्वाच्या मुद्द्यांवर सर्व पक्षांमध्ये सहमती झाली आहे. पहिला मुद्दा म्हणजे मतदार यादीतील कथित गैरप्रकार आणि मतांची चोरी याविरोधात सरन्यायाधीशांना पत्र लिहिणे. दुसरा मुद्दा म्हणजे नीट-यूजी (NEET-UG) पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करणे. तिसरा मुद्दा देशातील आर्थिक परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचा आहे. चौथा मुद्दा म्हणजे इंडिया आघाडीची बैठक दर दोन महिन्यांनी होईल आणि पुढील बैठक 8 ऑगस्ट रोजी हैदराबाद येथे आयोजित केली जाईल. पाचवा मुद्दा संसदेत सर्व विरोधी पक्षांमधील समन्वय कायम ठेवण्याचा आहे.
25 पक्षांचा सहभाग
इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर बोलताना खरगे यांनी म्हटले की, ‘इंडिया आघाडीच्या बैठकीत 25 राजकीय पक्ष सहभागी झाले होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनीही व्हर्च्युअल माध्यमातून बैठकीत सहभाग घेत आपली मते मांडली. या सर्व मुद्द्यांवर त्यांनीही सहमती दर्शवली आहे. त्यानंतर पाच महत्त्वाच्या मुद्द्यांवर सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. या मुद्द्यांसाठी आम्ही संघर्ष करू, त्यावर काम करू आणि पुढे जाऊ.’
सरन्यायाधीशांकडे पत्र दिले जाणार
मल्लिकार्जून खरगे यांनी, ‘एसआयआर, मतदार यादीतील कथित गैरव्यवहार आणि निवडणुकांमधील गैरप्रकारांविरोधात सरन्यायाधीशांना पत्र पाठवण्यावर एकमत झाले आहे. हे पत्र लवकरच सरन्यायाधीशांकडे सुपूर्द केले जाईल. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी करण्यावरही सर्व पक्ष सहमत झाले आहेत. कारण नीट आणि सीबीएसईच्या परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचा विश्वासघात झाला आहे’ असं म्हटलं आहे.
सर्वपक्षीय बैठकीची मागणी
दरम्यान, देशातील ढासळती आर्थिक परिस्थिती, वाढती बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सर्वसामान्य नागरिकांशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. तसेच सर्व पक्ष दर दोन महिन्यांनी एकत्र येतील, असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला असल्याचीही माहिती खरगे यांनी दिली आहे.