
देशातील सर्वात नामांकित आणि मोठ्या आयटी पार्क्सपैकी एक असलेल्या पुण्याच्या हिंजवडी आयटी पार्कमधून एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील फेज-2 मध्ये असलेल्या ‘थिंक टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ या आयटी कंपनीने अचानक आपले कामकाज बंद करून पोबारा केला आहे. अवघ्या काही महिन्यांतच कंपनीने रातोरात टाळे ठोकल्यामुळे, तिथे काम करणाऱ्या तब्बल 700 कर्मचाऱ्यांची भयंकर फसवणूक झाली असून त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ ओढवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘थिंक टेक्नॉलॉजी इंडिया’ ही कंपनी हिंजवडी आयटी पार्कच्या फेज-२ मध्ये २०२५ साली सुरू करण्यात आली होती. नोकरी देताना या कंपनीने ‘सिक्युरिटी डिपॉझिट’च्या (सुरक्षा ठेव) नावाखाली प्रत्येक कर्मचाऱ्याकडून १५ हजार रुपये वसूल केले होते. सुरुवातीच्या काळात या कंपनीने काही कर्मचाऱ्यांना सुरळीतपणे वेतनही दिले, ज्यामुळे कर्मचाऱ्यांचा कंपनीवर विश्वास बसला. मात्र, जानेवारी २०२६ पासून या कंपनीने अचानक आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार देण्याचे थांबवले आणि त्यांचे वेतन थकवण्यास सुरुवात केली.