
महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार स्वतंत्र चूल मांडणार अशा बातम्या येत आहेत. या सहा खासदारांच्या स्वतंत्र गट स्थापनेसाठी हालचाली सुरू आहेत. महाराष्ट्र आणि दिल्लीत अनेक घडामोडी घडत आहेत. अशात ओमराजे हे थेट पुणे विमानतळावर असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या पक्ष फुटीच्या या प्रकरणात ‘जर-तरचे’ राजकारण सुरू आहे. कोणतीही गोष्ट अद्याप स्पष्ट झालेली नाही, मात्र पडद्यामागे मोठ्या राजकीय घडामोडी घडत असल्याचं सांगितलं जात आहे.
काही तासांपूर्वीच ओमराजे यांनी प्रतिनिधीला ‘मी दिल्लीला वगैरे गेलो नाही’ असं सांगितलं होतं. मात्र त्यांनी ‘ठाकरेंच्या सोबत आहात का?’ या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं. वारंवार विचारताच त्यांनी फोन कट केला. यानंतर आता अचानक ते विमानतळावर दिसल्याने चर्चांना उधाण आलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ते दिल्लीहून आल्यानंतर तब्बल तीन तास व्हीआयपी लाउंजमध्ये बसून होते. अखेर माध्यमांना टाळून ते दुसऱ्या गेटने खासगी गाडीतून निघाले आहेत. ते इतका वेळ बसून का होते? दिल्लीत आणखी काय घडलं? असे प्रश्न उपस्थित राहिले आहेत.