
एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका तरुणीचा कुटुंबियांनी निकाह ठरवला होता. सर्व तयारी झाली होती. मुलीसाठी दागिने करण्यात आले. त्यानंतर सर्वजण निकाहसाठी घरी आले. पण अचानक नवरी मुलगी पळून गेली. त्यानंतर कुटुंबाची इज्जत जाऊ नये म्हणून दोन्हीकडच्या मंडळींनी तिच्या लहान बहिणीशी निकाह करुन देण्याचे ठरवले. पण नंतर अशा काही गोष्टी समोर आल्या की दोन्ही गटांमध्ये जोरदार मारामारी सुरु झाली. आता नेमकं प्रकरण काय आहे? जाणून घ्या…
उत्तर प्रदेशातील बरेलीच्या बिथरी चैनपूर परिसरातील एका गावातील तरुणीचे लग्न जवळच्याच गावातील एका तरुणाशी ठरले होते. शनिवारी नरियावल येथील एका हॉलमध्ये निकाहाची तयारी सुरू होती. दोन्ही कुटुंबे आणि नातेवाईकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. याच दरम्यान, शुक्रवारी रात्री नवरी अचानक घरातून बेपत्ता झाली. ती आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्याचे कुटुंबीयांना समजले. असे सांगितले जात आहे की, घरातून जाताना तरुणीने स्वतःसोबत दागिनेही नेले होते.
नवरी पळून गेल्याची माहिती मिळताच कुटुंबात एकच खळबळ उडाली. हे प्रकरण नवरदेवाच्या बाजूला समजताच दोन्ही कुटुंबातील लोक आमनेसामने आले. लग्न मोडण्याची वेळ आली. यानंतर नातेवाईक आणि गावातील प्रतिष्ठित लोकांनी अनेक तास पंचायत केली. बऱ्याच चर्चेनंतर आणि समजूत घातल्यानंतर दोन्ही बाजू या गोष्टीवर सहमत झाल्या की, नवरीच्या लहान बहिणीचा निकाह नवरदेवाशी लावून द्यावा, जेणेकरून लग्नही पार पडेल आणि दोन्ही कुटुंबांची प्रतिष्ठाही राखली जाईल.
लहान बहिणीची बाब समोर येताच वातावरण बिघडले
शनिवारी ठरलेल्या वेळेवर वरात नरियावलच्या हॉलमध्ये पोहोचली. निकाहाच्या विधीची तयारी सुरू झाली होती. त्याचवेळी कोणीतरी नवरदेवाच्या कुटुंबीयांना माहिती दिली की, ज्या लहान बहिणीसोबत निकाह ठरला आहे, तिचेही एका तरुणासोबत प्रेमप्रकरण सुरू असून तिचीही हे लग्न करण्याची इच्छा नाही. हे ऐकताच नवरदेवाकडील लोक संतापले. त्यांनी यावर आक्षेप घेतला. बघता बघता दोन्ही बाजूंमध्ये बाचाबाची सुरू झाली. काही वेळातच वाद इतका वाढला की लोक एकमेकांवर हल्ला करू लागले. विवाहस्थळी लाठ्या-काठ्यांचा वापर झाला आणि जोरदार दगडफेकही झाली. लग्नाचे वातावरण पूर्णपणे तणाव आणि गोंधळात बदलले.
तीन जण जखमी, पोलिसांनी चार जणांना घेतले ताब्यात
या हाणामारीत लग्नसोहळ्याला आलेली नवरीची चुलत बहीण, तिचा दीर आणि आणखी एक व्यक्ती जखमी झाली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. गोंधळ आणि हाणामारीनंतर लग्न पूर्णपणे रद्द करण्यात आले. वरात नवरीविनाच माघारी परतली.
बिथरी चैनपूरचे एसओ (SO) राजेश मिश्रा यांनी सांगितले की, ज्या तरुणीचा निकाह होणार होता, ती आपल्या प्रियकरासोबत निघून गेली होती. त्यानंतर तिच्या लहान बहिणीशी निकाह लावण्याची चर्चा झाली, परंतु तिचेही प्रेमप्रकरण समोर आल्यावर दोन्ही पक्षांमध्ये वाद झाला. या हाणामारीत दोन ते तीन जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.