
राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात इंधन टंचाई वाढली आहे. या इंधन टंचाईतून मुंबई सुटली होती. पण आज मुंबईच्या काही भागातही इंधन टंचाई निर्माण झाली आहे. काही ठिकाणी पेट्रोल पंप बंद आहेत. मुंबईच नव्हे राज्यातील अनेक भागात हेच चित्र आहे. काही ठिकाणी लोक पेट्रोल, डिझेल घेण्यासाठी रांगा लावून आहेत. तर काही लोक दादागिरी करताना, हाणामारी करताना आणि पेट्रोल पंपचालकाशी हुज्जत घालताना दिसत आहे. कॅनमध्ये पेट्रोल, डिझेल नेण्यास बंदी असतानाही कॅन आणि ड्रममधून पेट्रोल नेलं जात आहे. त्यामुळे या उपद्रवींवर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. अशा उपद्रवींवर कोणती कोणती कारवाई केली जाऊ शकते याची माहितीच नांदेडचे जिल्हा पुरवठा अधिकारी जगदीश बारदेवार यांनी दिली आहे.
नांदेड जिल्ह्यात सध्या इंधन टंचाई नाहीये. पण पॅनिक पर्चेसिंगमुळे जिल्ह्यात 35 टक्के डिझेलची अधिकची मागणी होती. जिल्ह्यात इंधनपुरवठा सुरळीत सुरु असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी जगदीश बारदेवार यांनी दिली. पेट्रोलची टंचाई नाही. मात्र डिझेलची मागणी 30 ते 35 टक्क्याने वाढल्याने डिझेल टंचाई सदृश परिस्थिती आहे. पंपांवर सुरू असलेली गर्दी आणि संभाव्य परिस्थितीमुळे काही पंपांवर परिस्थितीनुरूप पोलीस बंदोबस्तात डिझेल विक्री सुरू करण्यात आली आहे, अशी माहितीही बारदेवार यांनी दिली आहे.
तो नियम इथे नाही
आजपासून सर्वच पेट्रोल पंपांवर ड्रम, कॅनमध्ये डिझेल देण्यास बंदी घालण्यात आली आहे. शिवाय पंपांवर महसूल अधिकारी आणि पोलिसांचा बंदोबस्त राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. समाज माध्यमांवर डिझेल टंचाईच्या अफवा पसरवल्या जात आहेत. अश्या अफवा पसरवणाऱ्यांवर आयटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल केले जाणार आहेत. साठेबाजी केल्यास कारवाई केली जाणार आहे, असंही बारदेवार म्हणाले. कृषीमंत्र्यांनी कॅनमध्ये शेतकऱ्यांना डिझेल द्या असे म्हटले होते. पण नांदेड जिल्ह्यात मात्र पेट्रोलियम कायद्यानुसार कॅनमध्ये इंधन देता येत नाही, असं पुरवठा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे कॅन आणि ड्रममधून डिझेल नेणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे.
वाशिममध्ये रांगा घटल्या
दरम्यान, वाशिम जिल्ह्यात गेल्या 11 दिवसांपासून डिझेल तुटवड्याची परिस्थिती कायम असल्याचे चित्र आहे. मात्र, डिझेलसाठी पेट्रोल पंपांवर लागणाऱ्या रांगांमध्ये आता काही प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे. वाशिम शहरातील दक्षता पेट्रोल पंपावर दररोज सकाळपासून शेतकरी आणि वाहनधारकांच्या मोठ्या रांगा लागत होत्या. मध्यरात्रीपासूनच अनेक शेतकरी आणि वाहनधारक पेट्रोल पंप परिसरात थांबत होते आणि दुसऱ्या दिवशी डिझेल मिळवण्यासाठी रांगांमध्ये उभे राहत असल्याचे चित्र होते. मात्र, मागील दोन दिवसांपासून हे चित्र काही प्रमाणात बदलल्याचे दिसून येत आहे. जिल्हा प्रशासनाने वाहनांची आरसी आणि इतर कागदपत्रांची पडताळणी करूनच डिझेल वितरण करण्याचे नियम लागू केल्याने त्याचा परिणाम दिसून येत आहे.