
कल्याणमध्ये कौटुंबिक वादातून रक्ताची नाती एकमेकांच्या जिवावर उठल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वालधुनी येथील अशोक नगर परिसरात एका महिलेवर आणि तिच्या भावावर पती, सासरा, दीर आणि नणंदेने मिळून जीवघेणा हल्ला केला. विशेष म्हणजे, घरात सुरू झालेला हा राडा पोलीस ठाण्याच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला. तक्रार देण्यासाठी गेलेल्या बहीण-भावावर भररस्त्यात चाकू आणि दगडाने वार करण्यात आले. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून, आरोपी पती हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. महात्मा फुले पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे.
कल्याण वालधुनीतील अशोक नगर परिसरात राहणाऱ्या रुक्सार नावाच्या महिलेचा विवाह 8 वर्षांपूर्वी तन्वीर फरीद खान याच्याशी झाला होता. मात्र, लग्नानंतर काही काळातच पती तन्वीर, दीर सद्दाम, सासरा फरीद आणि नणंद शबाना यांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. या त्रासाला कंटाळून रुक्सारने यापूर्वी आत्महत्येचाही प्रयत्न केला होता.
तलाकच्या बैठकीत वाद
12 एप्रिल 2026 रोजी या वादावर पडदा टाकण्यासाठी आणि तलाक संदर्भात चर्चा करण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीत पुन्हा वाद उफाळून आला. आरोपींनी रुक्सारला मारहाण आणि शिवीगाळ केली. यानंतर दोन्ही बाजूचे लोक तक्रार देण्यासाठी महात्मा फुले पोलीस ठाण्याकडे निघाले.
पोलीस ठाण्याबाहेर थरार
रुक्सार आणि तिचा भाऊ अस्लम हे पोलीस ठाण्याजवळ पोहोचले असताना, आरोपींनी त्यांच्यावर भररस्त्यात चाकू आणि दगडाने हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. रक्ताच्या थारोळ्यात असलेले बहिण-भाऊ स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धावत पोलीस ठाण्यात शिरले. आरोपी त्यांचा पाठलाग करत पोलीस ठाण्याच्या आवारापर्यंत आले होते.
जखमींची प्रकृती चिंताजनक
या हल्ल्यात अस्लम आणि रुक्सार यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने मीरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांनाही शरीरावर 8 ते 10 टाके पडले असून अस्लमची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
पोलिसांची कारवाई
महात्मा फुले पोलिसांनी तत्परता दाखवत मुख्य आरोपी पती तन्वीर खान याला बेड्या ठोकल्या आहेत. तन्वीर हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी हद्दपारीची कारवाईही करण्यात आली होती. सध्या सासरा आणि दीर फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.