
ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या बनावट प्रती बाजारात उपलब्ध झाल्याचा आरोप करण्यात आला असून, यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. पुस्तकातील काही मजकुरावर पानसरे कुटुंबीयांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून दादोजी कोंडदेव यांचा उल्लेख करण्यात आल्याबाबत कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे.
या संदर्भात प्रशांत आंबी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या संबंधित पुस्तकांच्या प्रती तातडीने मागे घेण्यात याव्यात. तसेच या पुस्तकाचे अभिवाचन, ऑडिओ बुक आणि पीडीएफ स्वरूपातील आवृत्त्या विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असल्याचे त्यांनी सांगितले. युट्यूबसह इतर माध्यमांवर हे साहित्य उपलब्ध असल्याने त्याचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होत आहे. विशेषतः पीडीएफ प्रती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केल्या जात असल्याने त्या हटविण्यासाठी शासनाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे प्रशांत आंबी यांनी स्पष्ट केले.
“व्हायरल झालेल्या पीडीएफ प्रती आम्हाला स्वतःहून नष्ट करणे शक्य नाही. त्यामुळे शासनाने या संदर्भात योग्य ती कारवाई करावी,” असे त्यांनी म्हटले. तसेच ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या ऑडिओ बुकमध्ये काही दुरुस्त्या आवश्यक असल्यास संबंधितांना कायदेशीर नोटीस पाठविण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे इतिहास आणि साहित्य क्षेत्रात नव्या चर्चेला तोंड फुटले असून संबंधित पुस्तक आणि डिजिटल सामग्रीबाबत पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.