
पाच राज्याच्या निवडणुकांचे निकाल आता जवळपास स्पष्ट होताना दिसत आहेत. आसाममध्ये भाजपने स्पष्ट बहुमताच्या दिशेनं वाटचाल केली आहे. आसाममध्ये भाजपचे उमेदवार 102 जागांवर आघाडीवर आहेत तर काँग्रेसचे उमेदवार 21 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे आता आसाममध्ये भाजप तिसऱ्यांदा सत्ता स्थापण करणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. तर दुसरीकडे पुडूचेरीमध्ये देखील भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. पुडूचेरीमध्ये 30 जागांपैकी 21 जागांवर भाजपेच उमेदवार आघाडीवर आहेत. तर केरळमध्ये मात्र मोठा उलटफेर पहायला मिळत आहे. केरळ हा डाव्या पक्षांचा गड मानला जातो आणि डाव्या पक्षांच्या गडाला सुरूंग लावण्यात काँग्रेसला यश मिळालं आहे. केरळमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. केरळमध्ये काँग्रेसचे उमेदवार तब्बल 102 जागांवर आघाडीवर आहेत. केरळमध्ये डाव्या पक्षांना पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. अवघ्या 35 जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत.
दरम्यान पश्चिम बंगालमध्ये देखील मोठा उलटफेर पहायला मिळत आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपने ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे, भाजप पश्चिम बंगालमध्ये तब्बल 204 जागांवर आघाडीवर आहे. तर तृणमूल काँग्रेसची यावेळी मोठी पिछेहाट झाल्याचं पहायला मिळत आहे. तृणमूलच काँग्रेसचे उमेदवार केवळ 83 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे आता पश्चिम बंगालमध्ये आता भाजपची सत्ता येणार हे जवळपास निश्चित झालं आहे.
मात्र त्यामध्ये ममता बॅनर्जी यांच्यासाठी दिलासादायक गोष्ट म्हणजे ममात बॅनर्जी आणि भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांच्यामध्ये अटितटीचा सामना सुरू होता. मतमोजणीच्या अनेक फेऱ्यांपर्यंत सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांच्याविरोधात आघाडी घेतलेली होती. मात्र आता आकडा फिरल्याचं पहायला मिळत आहे. ममता बॅनर्जी यांच्यासाठी दिलासादायक बातमी समोर आली असून, ममता बॅनर्जी यांनी या मतदारसंघातून अधिकारी यांच्याविरोधात पाच हजार मतांची लीड घेतली आहे. आतापर्यंत सुवेंदू अधिकारी हे आघाडीवर होते, मात्र ते पिछाडीवर गेले आहेत. हा सुवेंदू अधिकारी यांच्यासह भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. याचं कारण म्हणजे पश्चिम बंगालचे पुढचे मुख्यमंत्री म्हणून सुवेंदू अधिकारी यांचं नाव चर्चेत आहे.