
मुंबईत हजारो फेरीवाले आहेत, यातील काही अधिकृत आहेत तर काही अनधिकृत आहेत. अशातच आता मुंबईतील फेरीवाले आणि त्यांच्या प्रश्नांबाबत महत्त्वाची बैठक पार पडली. महापालिका आयुक्तांसोबत झालेल्या या बैठकीला उपमहापौर संजय घाडी आणि शिवसेना नेते संजय निरूपम हेही उपस्थित होते. या बैठकीनंतर या दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेत फेरीवाल्यांबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. या बैठकीत नेमका काय निर्णय झाला याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
फेरीवाल्यांबाबत महत्त्वाची बैठक
फेरीवाल्यांबाबत झालेल्या बैठकीनंतर बोलताना उपमहापौर संजय घाडी यांनी म्हटले की, शिवसेनेचे नेते संजय निरूपम यांनी चार दिवसांपूर्वी माझ्याकडे एक निवेदन दिलं होतं. यात मुंबई शहरातील 99 हजार 435 अधिकृत वैध असलेल्या फेरीवाल्यांचे जे प्रश्न आहेत, याबाबत बैठक आयोजित करावी अशी मागणी करण्यात आली होती, त्याबाबत आज बैठक झाली. मुंबईमध्ये फेरीवाल्यांचा प्रश्न जुना आहे, अनेक वादविवाद यावर सुरु आहेत. अनेकदा कारवाई झाली आणि 2014 ला फेरीवाला कायद्याची तरतूद करण्यात आली.
10 तारखेपर्यंत ओळखपत्र दिले जाणार
पुढे बोलताना संजय घाडी यांनी म्हटले की, एकही अनधिकृत फेरीवाला मुंबईमध्ये राहिला नाही पाहिजे अशी आमची भूमिका आहे. 1 लाख 29 हजार 4 फेरीवाले पात्र आहेत. पण हायकोर्टाने आदेश दिल्यापासून अधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई सुरु आहे. अनधिकृत फेरीवाले यांच्यावर कारवाई होतं नाही. जोपर्यंत क्यूआर कोड आणि ओळखपत्र देईपर्यत कोणावर कारवाई होऊ नये. जून महिन्याच्या 10 तारखेपर्यत ओळखपत्र देण्यात येणार आहे. टाउन वेंडिंग कमिटी नेमण्यात येणार आहेत त्यानुसार आयोजन करण्यात येणार आहे. टाउन वेंडिंग कमिटी जे काम करेल ते आम्हाला मान्य असेल. आता 10 दिवसानंतर सर्व फेरीवाले व्यवसाय करणार आहेत.
सध्या कोणत्याही फेरीवाल्यावर कारवाई होणार नाही
दरम्यान, आता 10 जूनपर्यंत मुंबईतील सर्व फेरीवाल्यांना ओळखपत्र देण्यात येणार आहे. त्यानंतर जे फेरीवाले अनधिकृतपणे व्यवसाय करत असेल त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे. मात्र सध्या कोणत्याही फेरीवाल्यावर कारवाई होणार नाही अशी माहिती उपमहापौर घाडी यांनी दिली आहे.