
मुंबईतील रस्त्यांवर आणि रेल्वे स्टेशनबाहेर होणाऱ्या नमाज पठणाच्या मुद्द्यावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी मुंबई महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्तांना पत्र लिहून रस्त्यावरील नमाज पठण तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे.
किरीट सोमय्या यांनी म्हटलं की, मुंबईसारख्या व्यस्त शहरात रस्त्यावर नमाज पठणामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा होतो. विशेषतः शुक्रवारी दुपारच्या वेळी वर्दळीच्या ठिकाणी नमाज पठण केलं जात असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. ही परिस्थिती रोखण्याची जबाबदारी पोलिस प्रशासन आणि महापालिकेची असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
तसेच भविष्यात याच उदाहरणाचा आधार घेत इतर ठिकाणीही धार्मिक कार्यक्रमांच्या नावाखाली रस्ते अडवले जाऊ शकतात, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. वर्षातून एखाद्या दिवशी नाही तर प्रत्येक आठवड्यातच वर्दळीचे रस्ते विनाकारण अडवले जातात. काही कट्टर प्रवृत्तीचे लोक याला जन्मसिद्ध अधिकार मानून वागत असल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला. मुंबईतील सार्वजनिक व्यवस्था आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.