
गेल्या काही वर्षांमध्ये राज्याचा राजकारणात मोठ्या घडामोडी घडलेल्या आहेत. 2022 साली शिवसेनेत फूट पडली होती, एकनाथ शिंदे यांनी अनेक आमदारांसह पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. शिंदे यांनी भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली होती. राज्याच्या राजकारणातील ही एक मोठा घडामोड होती. यानंतर उद्धव ठाकरेंसोबत असलेले अनेक नेते एकनाथ शिंदे यांच्या पक्षात दाखल झाले होते. मात्र आता राजकारणात पुन्हा भूकंप होण्याची शक्यता आहे. कारण ठाकरे गटाच्या दोन नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नेत्यांना थेट ऑफर दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
संजय राऊत यांच्याकडून थेट ऑफर
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नेते नाराज असल्याबाबत प्रश्न विचारला होता. यावर बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की, ‘प्रत्येकाच व्यक्तिगत मत असतं, मलाही असं वाटतं की जर कुणाला पश्चाताप झाला असेल तर ते परत येऊ शकतात. ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी त्यांना अपमानित करत आहेत, त्यामुळे जर कुणाला वाटलं की आपल्याकडून चूक झाली. आम्हाला भ्रमात ठेवलं, आम्ही बहकलो. तर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मागे यायला पाहिजे.’
नेत्यांनी पुनर्विचार करावा – दानवे
संजय राऊत यांच्या या विधानावर आमदार अंबादास दानवे यांनाही याबाबत प्रश्न विचारला होता. यावर बोलताना दानवे यांनी म्हटले की, ‘संजय राऊत यांनी मांडलेली भूमिका योग्य आहे. ज्यांना-ज्यांना पश्चाताप झाला आहे, मला असं वाटतं त्यांनी घेतलेल्या भूमिकेचा पुनर्विचार करायला पाहिजे.’ या दोन्ही नेत्यांनी एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या नेत्यांना थेट ऑफर दिली आहे.
काय म्हणाले सत्तार ?
छत्रपती संभाजीनगर विधान परिषद निवडणुकीसाठी अब्दुल सत्तार यांच्या मुलाने भाजपच्या उमेदवाराविरोधात उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेत मतभेद असल्याचे समोर आले आहे. यानंतर दोन्ही शिवसेना एकत्र येणार का यावबर बोलताना अब्दुल सत्तार यांनी म्हटले की, ‘माझ्या मते, आता दोन्ही शिवसेना पक्षांनी एकत्र यावे. आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी जर एकत्र येण्याचा निर्णय घेतला, तर आम्हाला कोणाचीही परवानगी किंवा मत विचारण्याची गरज भासणार नाही. आम्ही एका मिनिटात त्यासाठी तयार होऊ. माझे नेते जो निर्णय घेतील, तो मला पूर्णपणे मान्य असेल.’