Headlines

Monsoon : 15 जूनपर्यंत पाऊस नाहीच, मान्सूनच्या सरकारी अंदाजामुळे चिंता वाढली, शेवटी भीती खरी ठरली!

Monsoon : 15 जूनपर्यंत पाऊस नाहीच, मान्सूनच्या सरकारी अंदाजामुळे चिंता वाढली, शेवटी भीती खरी ठरली!
Monsoon : 15 जूनपर्यंत पाऊस नाहीच, मान्सूनच्या सरकारी अंदाजामुळे चिंता वाढली, शेवटी भीती खरी ठरली!


Monsoon Prediction  : यंदा मान्सून लवकरच केरळमध्ये दाखल होईल असे सांगितले जात होते. मे महिन्याच्या शेवटपर्यंत मान्सू केरळमध्ये आणि त्यानंतर लवकरच तो महाराष्ट्रातही दाखल होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु हा अंदाज सपशेल चुकीचा ठरला. आता मान्सून तुलनेने उशिरा केरळात दाखल झाला आहे. केरळनंतर आता मान्सून तळकोकणातही आला आहे. मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाची तयारी पूर्ण केली आहे. आता लवकरच राज्यभरात पेरणीचे काम होणार आहे. असे असतानाच आता राज्य सरकारने मान्सून आणि पावसाविषयी महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला आहे. या अंदाजामुळे एका प्रकारे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

राज्य सरकारने नेमकं काय सांगितलं?

राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाने शेतकऱ्यांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. राज्यभरातील पाऊस आणि मान्सून याविषयी यात महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी आहे, असे राज्य सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे. मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर किमान 15 जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता हवामानाच्या सध्याच्या अंदाजातून दिसून येत आहे. त्यामुळे या कालावधीत राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता कमी आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे.

…अशी परिस्थिती अद्याप दिसत नाही

सध्याच्या हवामान अंदाजानुसार किमान 15 जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश, आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढग आणि विखुरलेल्या स्वरूपाचा मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, हा पाऊस व्यापक क्षेत्रात पेरणीस पोषक ठरेल, अशी परिस्थिती अद्याप दिसत नाही, असेही मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले आहे.

वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये

दरम्यान, किमान 12 जूनपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान सध्याप्रमाणेच उच्च राहण्याची शक्यता आहे. विदर्भ व खानदेशात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक, तर मराठवाड्यात 35 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शेतकरी व नागरिकांना पुढीलप्रमाणे आवाहन करण्यात येत आहे. आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये. विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणे टाळावे, असे सांगण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *