
ठाणे आणि रायगड जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. सततच्या पावसामुळे उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली असून, नदीकाठच्या भागांसाठी प्रशासनाने सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.
माहितीनुसार, उल्हास नदीची इशारा पातळी 17.50 मीटरवर पोहोचली असून, नदीकाठच्या काही सखल भागांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आणि नदीकाठच्या परिसरात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, बदलापूर नगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा पूर्णपणे सज्ज करण्यात आली असून, परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री, बचाव पथके आणि संबंधित अधिकारी सतर्क ठेवण्यात आले आहेत.
हवामान विभागाने पुढील काही तासांतही मुसळधार पावसाचा इशारा कायम ठेवला असल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय नदीकाठच्या भागात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.