
देशातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. चेन्नई येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत टिप्पणी केली. एआयएडीएमके पक्ष मोदींसोबत युती कशी करू शकतो, असा सवाल उपस्थित करत त्यांनी तीव्र शब्दांत टीका केली. या वक्तव्यावर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरगे यांच्या विधानाचा निषेध करत जोरदार टीका केली. “सततच्या पराभवामुळे त्यांच्या वक्तव्यांवर परिणाम झाला असावा. देशभक्त आणि आधुनिक भारत घडवणाऱ्या पंतप्रधानांबद्दल अशा प्रकारचे अपशब्द वापरणे अयोग्य आहे,” असं फडणवीस म्हणाले.
तसेच, “काँग्रेसची ही जुनीच भूमिका असून यापूर्वीही त्यांनी मोदींविरोधात अशा प्रकारची भाषा वापरली आहे. मात्र प्रत्येक वेळी जनता त्यांना योग्य उत्तर देते,” असंही त्यांनी नमूद केलं. फडणवीस यांनी खरगे यांनी आपलं वक्तव्य मागे घेऊन सार्वजनिक माफी मागावी, अशी मागणी केली आहे. या प्रकरणामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.