
विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार झाल्याच्या आरोपांवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकीदरम्यान उमेदवारांना आर्थिक अमिषे दाखवून आणि दबाव टाकून माघार घेण्यास भाग पाडल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत असताना, सत्ताधारी पक्षाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत मोठी मागणी केली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “अशा प्रकारचे घोडेबाजार थांबवायचे असतील तर ही निवडणूक पद्धत बंद करावी किंवा ओपन व्होटिंगची व्यवस्था लागू करावी. यासाठी मी संसदेत विधेयक आणणार आहे. गरज पडल्यास निवडणूक आयोगाकडे आणि न्यायालयातही जाणार आहे.” लोकशाही प्रक्रियेत पैशांचा हस्तक्षेप थांबला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली. तसेच घोडेबाजाराच्या आरोपांबाबत पुरावे देण्यासही आपण तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे. “माणसं प्रेमाने जिंकता येतात, हे जर समजलं तर कोणत्याही बिलाची गरज भासणार नाही,” असे म्हणत त्यांनी सुळेंच्या मागणीवर अप्रत्यक्ष टीका केली.
सुळे यांनी घोडेबाजाराच्या आरोपांबाबत पुरावे सादर करण्याची तयारी दर्शवल्यानंतर या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्यातील राजकारण अधिकच तापले असून, सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे.