
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना काटकसरीचा संदेश दिल्यानंतर राज्य सरकारनेही त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या कमी करण्यासह परदेश दौऱ्यांवरही निर्बंध आणण्याचा मोठा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासमोर निर्माण होणाऱ्या आर्थिक संकटांचा विचार करून काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. त्यावर टीका करण्याऐवजी सर्वांनी सहकार्य करायला हवे.” मोदी यांनी सोन्याची खरेदी टाळणे, इंधनाचा जपून वापर करणे आणि परदेशी खर्च कमी करण्याचे आवाहन केले होते.
फडणवीस यांनी स्पष्ट केले की, “मुख्यमंत्री आणि सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या कमी केल्या जातील. तसेच अधिकारी आणि मंत्र्यांचे परदेश दौरेही मर्यादित केले जातील.” त्यांनी पुढे सांगितले की, “मोदी यांनी देशासाठी सहा महिन्यांचा कालावधी मागितला आहे. त्यामुळे त्यांना साथ देणे आवश्यक आहे.”
दरम्यान, विरोधकांनी मोदी यांच्या आवाहनावर टीका केली असली तरी, जनतेकडून या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.