
विधान परिषदचे आमदार सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला रामराम ठोकला आहे. त्यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का आहे. कारण एक आठवडाभरापूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदारांनी बंडखोरी केली. त्यापाठोपाठ आता लगेच आमदार सचिन अहिर यांचा पक्षप्रवेश झाला. आता सचिन अहिर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकार परिषदेत ते ठाकरेंवर अक्षरश: बरसले आहेत.
काय म्हणाले सचिन अहिर?
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, मी एकनाथ शिंदे यांचा आभार मानतो. कोळश्यातून हिऱ्याची चमक दिसते. आणि तो हिरा जवळ करण्याची संधी येते त्यातून विश्व घडतं. शिंदेंनी मला उपसभापती या पदावर मान दिला. तळागाळातील कार्यकर्ता या पदावर जाऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिलं. त्यांनी कॉमन मॅन म्हणून मुख्यमंत्री असताना काम केलं. सरकारमध्ये राहून काम केलं पाहिजे. पण विधिमंडळातूनही काम करण्याचं काम मी त्यांच्या नेतृत्वात करणार आहे. उपसभापतीपदासाठी अनेक लोकांची नावे घेता येतील. रासू गवई, वसंत डावखरे, माणिकराव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांनी उपसभापती म्हणून मोठं काम केलं. तीच गरीमा मी ठेवणार आहे. जिथे पक्ष बळकट नाही. तिथे काम करणार आहे. ग्रामीण भागात जाऊन काम करणार आहे.
“महापालिकेत माझं काय योगदान आहे हे तिथल्या लोकांना माहीत”
पुढे ते म्हणाले, राजकीय प्रश्नावर मी वेगळ्या व्यासपिठावर उत्तर देईन. ते टीका करतील. आम्ही सोबत आहोत तर चांगले आहोत. सोबत नाही तर नालायक आहोत असं बोललं जातील. ही भूमिका दुर्देवी आहे. मी वेगळ्या व्यासपीठावरून त्यावर बोलेन. प्रतिक्रिया येऊ द्या. कोण म्हणतं मी स्वार्थासाठी आलो. वगैरे टीका होत आहे. त्या येऊ द्या. वेळेवर योग्य रितीने योग्य उत्तर देईन. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी जी जबाबदारी दिली. ती पार पाडण्याचं काम केलं आहे. शिंदेही साक्षीला आहे. पक्ष म्हणून जी जबाबदारी असते तिथे काम करावं लागतं. विधानसभा आणि महापालिकेत माझं काय योगदान आहे हे तिथल्या लोकांना माहीत आहे. पुण्यातील २१ विभागातील लोकांनाही योगदान माहीत आहे. काही लोकांना वाटतं आम्हीच आहोत बाकी कोण नाही.