
राज्यात ‘ऑपरेशन टायगर’नंतर आता ‘ऑपरेशन तुतारी’च्या चर्चांना वेग आला असून, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे खासदार आणि प्रवक्ते अमोल कोल्हे यांच्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. “ऑफर आली तर विचार करू,” या वक्तव्याचा राजकीय अर्थ लावला जात असताना, दुसरीकडे आमदार रोहित पवार यांनी पक्षातील कोणताही नेता कुठेही जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, अमोल कोल्हे हे पक्षाचे वरिष्ठ नेते आणि अधिकृत प्रवक्ते आहेत. त्यामुळे त्यांनी केलेले वक्तव्य हे वैयक्तिक नसून पक्ष नेतृत्वाच्या भूमिकेनुसारच असण्याची शक्यता असल्याचा दावा त्यांनी केला.
रोहित पवार यांच्या भूमिकेवरही भाष्य करत शिरसाट म्हणाले की, रोहित पवार जे बोलतात ते शरद पवार यांचे मत असते, मात्र वेळोवेळी भूमिका बदलणे ही राष्ट्रवादीची जुनी पद्धत असल्याची टीकाही त्यांनी केली. “ऑफर आली तर जायचे, हे आधीच ठरलेले दिसते,” असा आरोप करत त्यांनी अमोल कोल्हे यांच्या वक्तव्याला अधिक महत्त्व असल्याचे सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे कौतुक होत असल्याचाही उल्लेख करत, बदलाचे वारे वाहू लागले की अशा प्रकारची वक्तव्ये समोर येतात, असेही संजय शिरसाट यांनी म्हटले. दरम्यान, ‘ऑपरेशन तुतारी’च्या चर्चांमुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापले असून, आगामी काळात विरोधी पक्षांतील नेत्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.