Headlines

Uday Samant | बंडखोरी मिटवण्यासाठी महायुतीचे प्रयत्न; गोकुळ गीते पाठिंबा देतील, उदय सामंतांचा विश्वास

Uday Samant | बंडखोरी मिटवण्यासाठी महायुतीचे प्रयत्न; गोकुळ गीते पाठिंबा देतील, उदय सामंतांचा विश्वास
Uday Samant | बंडखोरी मिटवण्यासाठी महायुतीचे प्रयत्न; गोकुळ गीते पाठिंबा देतील, उदय सामंतांचा विश्वास


नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीसमोर उभ्या राहिलेल्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. गणेश गीते यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन उमेदवारांनीही माघार घेतल्याचे त्यांनी सांगितले. मात्र गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे यांचे उमेदवारी अर्ज अद्याप कायम आहेत. याबाबत बोलताना उदय सामंत म्हणाले, “प्रसाद हिरे यांच्याशी मी सकाळपासून दोन वेळा चर्चा केली आहे. तसेच मंत्री दादा भुसे त्यांची भेट घेणार आहेत.”

महायुतीकडून या निवडणुकीत एकजुटीने लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला असून, नाशिकमधील मतभेद मिटवण्यासाठी शिवसेनेकडून उदय सामंत आणि भाजपकडून गिरीश महाजन प्रयत्नशील आहेत. उदय सामंत यांनी सांगितले की, “मी गोकुळ गीते यांना विनंती केली आहे. गिरीश महाजन स्वतः जळगावहून नाशिकला आले आहेत. ते गणेश गीते आणि गोकुळ गीते यांची भेट घेणार आहेत. योग्य आणि सकारात्मक निर्णय होईल, असा मला विश्वास आहे. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना दोन्ही उमेदवारांचे समर्थन मिळेल, अशी अपेक्षा आहे.”

दरम्यान, गोकुळ गीते यांनी आपण माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यावर प्रतिक्रिया देताना उदय सामंत म्हणाले, “कोणत्याही उमेदवारावर दबाव आणू नये, या मताशी मी शंभर टक्के सहमत आहे. आम्ही केवळ सन्मानपूर्वक विनंती करत आहोत. पक्षासमोर अडचण निर्माण झाली असेल तर संवादातून मार्ग काढला पाहिजे.” ते पुढे म्हणाले, “मी ज्या पक्षाचे नेतृत्व मानतो, त्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षासमोर अडचण निर्माण झाली असेल तर दबाव टाकण्याचा प्रश्नच येत नाही. गोकुळ गीते आमच्या विनंतीचा आदर करतील, असा मला विश्वास आहे.” राजकारणात समज-गैरसमज होत असतात. मात्र ते वेळेत दूर केले तर त्याचे दूरगामी परिणाम होत नाहीत, असेही सामंत यांनी नमूद केले. “महायुतीला पोषक असा निर्णय होईल, याबाबत मी आशावादी आहे,” असे ते म्हणाले.

गिरीश महाजन यांच्याबाबत बोलताना सामंत यांनी स्पष्ट केले की, “मला गिरीश महाजन यांचे खच्चीकरण करायचे नाही आणि त्यांनाही माझे खच्चीकरण करायचे नाही. आम्ही दोघेही महायुतीचे मंत्री आहोत. यातून सुवर्णमध्य निघावा आणि महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे मोठ्या मताधिक्याने विजयी व्हावेत, हीच आमची भूमिका आहे.” उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली असली तरी संबंधित उमेदवारांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे नाशिक विधान परिषद निवडणुकीतील राजकीय घडामोडींना आणखी वेग आला असून, महायुतीतील मतभेद मिटवण्यासाठी हालचालींना गती मिळाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *