
मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीपूर्वी मोठा वाद निर्माण झाला असून अभिनेते विजय पाटकर यांनी निवडणूक प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. “एका मंत्र्यांच्या दबावामुळे मला उमेदवारी अर्ज भरू दिला नाही,” असा धक्कादायक दावा विजय पाटकर यांनी केला आहे.
सध्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक सुरू असून तब्बल दहा वर्षांनंतर ही निवडणूक होत आहे. यासाठी 60 उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून त्यातून 17 जणांची निवड होणार आहे. विजय पाटकर यांनी सांगितलं की, त्यांनी उमेदवारी अर्ज भरून कोल्हापूरला पाठवला होता, मात्र काही लोकांनी राजकीय दबाव टाकत त्यांचा अर्ज प्रक्रियेतून रोखला. यावेळी त्यांनी महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्यावरही थेट निशाणा साधला. “महामंडळाचं अक्षरशः थडगं केलं गेलं आहे. कर्मचाऱ्यांना सात महिने पगार दिला नाही आणि आता मला त्यांच्या पॅनलमधून उभं राहण्यास सांगितलं जात आहे,” असा संताप त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, एका मंत्र्यांचा ओएसडी मागील काही दिवसांपासून कोल्हापुरात तळ ठोकून असून निवडणुकीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही पाटकर यांनी केला. “राजकारण्यांनी चित्रपट क्षेत्रात हस्तक्षेप करू नये,” असंही त्यांनी स्पष्टपणे म्हटलं.
विशेष म्हणजे, अभिनेत्री क्रांती रेडकर आणि निशिगंधा वाड यांचेही उमेदवारी अर्ज नाकारण्यात आल्याचा दावा विजय पाटकर यांनी केला आहे. या सर्व आरोपांमुळे मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीभोवती नवा वाद निर्माण झाला आहे.