
पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये मंगळवारी धक्कादायक घटना घडली आहे. भरदिवसा एका आरटीआय (RTI) कार्यकर्त्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिरगाव परिसरात ही थरारक घटना घडली, यात आत्माराम पाटील यांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी दुपारी आत्माराम पाटील हे वसई तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील यांच्यासोबत एका शासकीय कामासाठी शिरगाव येथील खदान परिसरात गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर हल्ला करत त्यांना ठार करण्यात आले. आता याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
कुटुंबियांचा गंभीर आरोप
आत्माराम पाटील यांच्या हत्या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांनी मोठा आरोप केला आहे. आरोपी भालचंद्र पाटील आणि महेश पाटील यांचा अनधिकृत बंगला, खादान, बेकायदेशीर जमिनी हडप केल्याच्या विरोधात तक्रारी केल्याचा राग मनात धरून, मंडळाधिकारी प्रभाकर पाटील यांच्या समोर आत्माराम पाटील यांची अक्षरश: दगडाने ठेचून हत्या केल्याचे कुटुंबियांनी म्हटले आहे.
कशी घडली घटना?
शिरगाव येथील खदानीबाबत अमित चौधरी यांनी तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीनंतर तहसीलदार यांच्या आदेशावरून मंडलाधिकारी प्रभाकर पाटील पाहणी करण्यासाठी गेले होते. या तक्रारदाराच्या सांगण्यावरून मयत आत्माराम पाटील तेथील परिस्थिती दाखवायला गेले असता आरोपींनी रागाच्या भरात त्यांची हत्या केली आहे. 10 ते 12 जणांनी ही हत्या केली असून, 2 जणांना ताब्यात घेतले आहे तर अन्य आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आली आहेत.
घरात सत्यनारायणाची पूजा अन्…
आत्माराम पाटील यांच्या भावाच्या मुलाचे दोन दिवसापूर्वी लग्न झाल्याने मंगळवारी त्यांच्या घरात सत्यनारायणाची पूजा होती. एकीकडे लग्नाचा आनंद घरात होता, दुसरीकडे घरात दुपारी 12 वाजता सत्यनारायणाची पूजा सुरू होती त्याच वेळेत आत्माराम पाटील यांची दगडाने ठेचून आत्महत्या केली आहे. आत्माराम पाटील हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी भालचंद्र पाटील हा विरार पूर्व कडील मोठा आका असून अनेक कुटुंबियांच्या जमिनी त्यांनी हडप केल्या असल्याचा आरोप ही करण्यात आला आहे. त्यामुळे विरारच्या अक्का वर कडक कारवाही करावी अशी मागणी आत्माराम पाटील यांच्या कुटुंबियांनी केली आहे.