
उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपता संपता राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यात बुडून ५ जणांचा मृत्यू झाल्याच्या अत्यंत दुर्दैवी घटना समोर आल्या आहेत. सांगलीत एका निवासी शाळेच्या जलतरण तलावात १२ वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये तलावात ३ अल्पवयीन मुलांचा आणि भंडाऱ्यात देवदर्शनासाठी आलेल्या एका ३२ वर्षीय तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
सांगलीत निवासी शाळेत विद्यार्थ्याचा मृत्यू; नातेवाईकांचा निष्काळजीपणाचा आरोप
सांगलीच्या आप्पासाहेब बिरनाळे निवासी शाळेमध्ये जलतरण तलावामध्ये बुडून एका १२ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली. आदित्य विकास ओलेकर (१२) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो कवठेमंकाळ तालुक्यातील कोकळे गावचा रहिवासी होता. शनिवारी दुपारी शाळेतील विद्यार्थ्यांना पोहण्यासाठी जलतरण तलावात नेण्यात आले होते. तेथे आदित्यचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
आदित्यच्या नातेवाईकांनी शाळा व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले आहेत. आदित्यला पोहता येत नसतानाही त्याला जलतरण तलावात निष्काळजीपणे सोडण्यात आले, असा आरोप मृत आदित्यचे चुलते प्रा. डॉ. प्रमोद ओलेकर यांनी केला आहे. तसेच याप्रकरणी शाळेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे, शाळेचे शाखा व्यवस्थापक जिनेंद्र पाटील यांनी सांगितले की, पोहण्यास शिकवणाऱ्या शिक्षकांनी आदित्यला पोहता येते का, असे विचारूनच तलावात पाठवले होते. त्यावेळी त्याचे मित्रही सोबत होते. याप्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश कदम यांनी सांगितले की, नातेवाईकांच्या शंकेनुसार पोलिसांकडून या प्रकरणाचा तातडीने तपास आणि योग्य ती कायदेशीर कारवाई केली जात आहे.
तलावात बुडून ३ अल्पवयीन मुलांचा अंत
छत्रपती संभाजीनगर शहरालगतच्या देवळाई तांडा परिसरातील साई टेकडी येथील तलावात शनिवारी सायंकाळी आणखी एक मोठी दुर्घटना घडली. या ठिकाणी पोहण्यासाठी गेलेल्या ५ मुलांपैकी ३ अल्पवयीन मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला. सुदैवाने २ मुलांना जीवदान मिळाले.
मिळालेल्या माहितीनुसार, पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज न आल्याने सर्व मुले पाण्यात बुडू लागली. यातील दोघांनी कसाबसा स्वतःचा जीव वाचवला. मात्र तीन मुले खोल पाण्यात बुडाली. नगरसेवक मोहित त्रिवेदी यांनी अग्निशमन दलाला माहिती दिल्यानंतर, पद्मपुरा आणि कांचनवाडी अग्निशमन केंद्राच्या पथकाने तातडीने शोधमोहीम राबवून तिन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढले.
विशाल मच्छिंद्र घुले (१५), आदर्श गौतम इंगोले (१५), यश ज्ञानेश्वर बरंबाईल (१६) अशी या तीन मुलांची नावे आहे. ही तिन्हीही मुले सातारा परिसरातील लक्ष्मी कॉलनी येथील रहिवासी होते. त्यांचे मृतदेह चिकलठाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
देवदर्शनासाठी आलेल्या तरुणाचा सूर नदीत बुडून मृत्यू
भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील खोडगाव येथे सूर नदीच्या खोल पाण्यात बुडून एका ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. शलाब मोहन कडव (३२) असे मृत तरुणाचे नाव आहे. शलाब आपल्या कुटुंबासह धार्मिक कार्यक्रमानिमित्त खोडगाव येथे देवदर्शनासाठी आला होता. दर्शनानंतर तो सूर नदीपात्रात अंघोळीसाठी उतरला. मात्र, खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेला. त्याचा भाऊ विक्रमने मदतीसाठी आरडाओरड केली. पण पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्याला वाचवता आले नाही. शेवटी वरठी पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने ३ तास शोधमोहीम राबवून शलाबचा मृतदेह बाहेर काढला.