
देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर तमिळनाडूच्या राजकारणात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. टीव्हीके पक्षाने मंगळवारी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा सादर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बहुमत सिद्ध करण्यासाठी टीव्हीके पक्षाने राज्यपालांकडे दोन आठवड्यांचा कालावधी मागितला आहे. राज्यपालांकडून परवानगी मिळाल्यास गुरुवारी चेन्नई येथे नव्या सरकारचा शपथविधी पार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
234 सदस्यीय विधानसभा असलेल्या तमिळनाडूमध्ये बहुमतासाठी 118 आमदारांचे समर्थन आवश्यक आहे. टीव्हीके पक्षाकडे सध्या 108 आमदारांचे समर्थन असून बहुमतासाठी अजून 10 आमदारांची गरज होती. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने टीव्हीके पक्षाला पाठिंबा दर्शवत सत्ता स्थापनेसाठी निर्णायक भूमिका घेतली आहे.
दरम्यान, टीव्हीके पक्षाचे अध्यक्ष विजय यांनी काँग्रेसकडे पत्र लिहून पाठिंबा मागितला होता. त्यानंतर काँग्रेसने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असून, आगामी लोकसभा, राज्यसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी दोन्ही पक्षांमध्ये आघाडी कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घडामोडींमुळे तमिळनाडूतील सत्तासमीकरणे बदलण्याचे संकेत मिळत असून, नव्या सरकार स्थापनेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.