
पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यानंतर या निकालावर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी हा निकाल दुर्दैवी असल्याचे म्हटले असून, आता उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना ओमराजे निंबाळकर म्हणाले की, गेल्या 20 वर्षांपासून या प्रकरणातील आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी कुटुंबीय, तपास यंत्रणा आणि संबंधित सर्वजण सातत्याने प्रयत्न करत होते. मात्र, न्यायालयाचा जो निकाल समोर आला आहे तो निराशाजनक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
निंबाळकर यांनी पुढे सांगितले की, सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील करण्यात येणार आहे. उच्च न्यायालयाकडून न्याय मिळेल, अशी अपेक्षा असून पुढील कायदेशीर लढा सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोर्टाच्या निकालावर थेट भाष्य करण्यापेक्षा उच्च न्यायालयासमोर आपली बाजू प्रभावीपणे मांडणे अधिक महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे आता या प्रकरणातील पुढील लढाई उच्च न्यायालयात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, तब्बल दोन दशकांपासून चर्चेत असलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणातील निकालानंतर राज्यभरात विविध प्रतिक्रिया उमटत असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी आणि उच्च न्यायालयातील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. tv9marathinews