
अभिनेता मनोज वाजपेयी हा बॉलिवूडमधील सर्वांत प्रतिभावान आणि यशस्वी कलाकारांपैकी एक आहे. त्याने आतापर्यंतच्या त्याच्या करिअरमध्ये अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत. लवकरच तो ‘गव्हर्नर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तो ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’च्या गव्हर्नरची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका पॉडकास्ट मुलाखतीत मनोज त्याच्या करिअरमधील कठीण काळाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. ‘सत्या’सारख्या दमदार चित्रपटात काम करूनही एकेकाळी मनोजला कामाविना घरी बसावं लागलं होतं. त्याला चित्रपटांचे ऑफर्सच मिळत नव्हते. या काळात शनिचा त्याच्या करिअर आणि आयुष्यावर कसा प्रभाव जाणवला, याविषयी त्याने समजावून सांगितलं.
साडेसाती हे शनिचं एक विशेष गोचर आहे, जे साडेसात वर्षे टिकतं. या काळात शनिदेव तुमची परीक्षा घेतो, असं मानलं जातं. यामुळे मनोज वाजपेयीला खूप संघर्ष करावा लागला होता. मात्र जेव्हा तो या परीक्षेतून यशस्वीपणे बाहेर पडले, तेव्हा त्याला त्यांच्या कारकिर्दीत मोठं यश मिळालं. या पॉडकास्ट मुलाखतीत मनोजने शनिदेवाच्या परीक्षेचं संपूर्ण गणित समजावून सांगितलं. तो म्हणाला, “शनि तुमच्या आयुष्यात समस्या घेऊन येतातच, पण त्याचसोबत ते तुम्हाला अध्यात्मिकदृष्ट्या अधिक मजबूत बनवतात. ते तुम्हाला सर्वांत जास्त संघर्ष करायला लावतात, पण त्या बदल्यात ते सर्वांत जास्त यशसुद्धा देतात. तुम्हाला सहजतेनं काहीच मिळत नाही.”
“शनिदेव तुमच्याकडून मेहनतीची मागणी करतो. अगदी छोट्यातली छोटी गोष्ट किंवा ओळख मिळवण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागते. तुम्हाला जी गोष्ट प्रिय असेल ती मिळवण्यासाठीही शनिदेव मेहनत करायला सांगतात. मग ते आई-वडिलांकडून असो किंवा जोडीदाराकडून. तुम्हाला स्वत:कडून समोरच्या व्यक्तीला बरंच काही द्यावं लागतं. पण जेव्हा तुम्हाल गोष्टी मिळायला सुरुवात होते, तेव्हा तुम्हाला जाणवतं की जे तुमच्यासोबत घडलं ते चांगलंच होतं”, असं त्याने पुढे सांगितलं.
मनोज वाजपेयीकडे आज एकापेक्षा एक दमदार प्रोजेक्ट्स आहेत. ‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजमधूनही त्याने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. याशिवाय त्याने चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. पण हे सर्व त्याला सहज मिळालेलं नाही. अथक परिश्रम आणि मेहनतीनंतर त्याला या यशाची चव चाखता आली आहे.