
महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मध्यरात्री झालेल्या कथित भेटीची चर्चा रंगली होती. एका ट्विटच्या आधारे ही माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं होतं. सूत्रांच्या हवाल्याने ‘प्रबुद्ध भारत’ या मीडिया हाऊसने दोन्ही नेत्यांची ‘वर्षा’ निवासस्थानी मध्यरात्री भेट झाल्याचा दावा केला होता. मात्र, या भेटीमागील नेमकं कारण स्पष्ट न झाल्याने चर्चांना अधिकच उधाण आलं.
दरम्यान, या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडत या भेटीचा ठाम इन्कार केला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, “उद्धव ठाकरेंना मला भेटायचं असेल, तर ती भेट लपूनछपून करण्याची गरज नाही. आम्ही अशा भेटी उघडपणे करू शकतो. आमच्यात असं काहीही नाही की जे लपवण्याची गरज आहे.”
फडणवीस यांनी पुढे स्पष्ट केलं की, अशा प्रकारची कोणतीही भेट झालेली नाही. तसेच काही लोक जाणीवपूर्वक चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवत असल्याचा आरोप करत त्यांनी अशा ‘खोट्या हँडल्स’वर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला. या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना वेगळं वळण मिळालं असून, विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण अधिकच तापण्याची चिन्हे दिसत आहेत.