
देवेंद्र फडणवीस Image Credit source: टीव्ही ९ मराठी
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray Meet at Midnight: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची मध्यरात्री दोन वाजता भेट झाल्याचा दावा करण्यात आला होता. या वृत्तावर फडणवीस यांनी थेट उत्तर दिले. या वृत्ताने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. ना ना तर्कवितर्क लढवले गेले. तर खासदार संजय राऊत यांनी आपल्याला याविषयी काही माहिती नाही, फडणवीस आणि ठाकरे हेच त्यावर बोलतील असे म्हणत चुप्पी साधली. त्यामुळे या प्रकरणात मोठा सस्पेन्स तयार झाला. नाशिकमध्ये मुख्यमंत्री आले असताना माध्यमांनी त्यांना या भेटीविषयी प्रश्न केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यावर थेट उत्तर दिले.
लपून-छपून भेटण्याची गरज काय?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्र्यंबकेश्वरमध्ये दखल झाले. दर्शनानंतर गोदा ते नर्मदा जल यात्रेच्या शुभारंभ कार्यक्रमाला फडणवीस उपस्थिती लावणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. “असं आहे की, उद्धव ठाकरे यांना जर माझ्याशी बोलायचे असेल अथवा आमची भेट व्हायची असेल तर ती लपून छपून करण्याची आवश्यकता नाही. ती उघडपणे होऊ शकते. असे कुठलेच विषय आमच्यात नाहीत, की जे लपवण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकारची कुठलीही भेट घडलेली नाही. काही लोकं जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने खोट्या बातम्या देतात. या खोटारड्या हँडल्सला नोटीस बजावण्यात येईल.” असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये मध्यरात्री भेट झाल्याचे वृत्त खोटं असल्याचे दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्यांनीच स्पष्ट केले आहे. या भेटीवर आता पडदा पडला आहे.
काय होतं वृत्त?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसने याविषयीचा दावा केला होता. सूत्रांच्या माहिती आधारे या हँडलने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची मध्यरात्री 2 वाजता भेट झाल्याचे वृत्त दिले होते. त्यातून राज्यात एकच खळबळ उडाली होती. ही भेट विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर झाली नसावी ना, असे तर्कवितर्क लढवले जात होते. पण उद्धव ठाकरे यांच्यासोबत कोणती भेट झाली नाही आणि लपूनछपून भेटण्याची कोणतीही गरज नाही असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तर अशा खोट्या बातम्या प्रसारित करणाऱ्या हँडल्सला नोटीस बजावणार असल्याचेही त्यांनी सांगितले.